Saturday 30 May 2015

माझं पोस्टर

मुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी आपण वेगवेगळे उपक्रम राबवत असतो.यातील मुलांचा सहभाग पोस्टरवर चितारला तर काय मजा येईल.मुलांना स्वत: त्या पोस्टरमध्ये पाहून खुप खुप आनंद होईल.
    ★पालकांनाही आपल्या पाल्याचे कौतुक वाटेल.
     ★ सातत्यपुर्ण सर्वंकष मूल्यमापनासाठी खुप मदत होईल.
     ★ मुलांना प्रोत्साहन व प्रेरणा मिळेल.
     ★ मुलं एकमेकांचं कौतुक करतील.

★पोस्टर निर्मिती— कोरल ड्राॅ सारख्या डिझाईन साॅफ्टवेअर मध्ये छान पोस्टर बनविता येतील.
    
                       © समाधान शिकेतोड
  

Thursday 28 May 2015

उपक्रमशील शिक्षक

ग्रुपची वर्षपुर्ती.......
उपक्रमशील शिक्षक हा ग्रुप मी तयार केला होता.त्यावरील ही आजची पोस्ट....
दिनांक 28/5/2014 रोजी उपक्रमशील शिक्षक हा ग्रुप तयार केला होता.
सोशल मिडीयाच्या मदतीनं शिक्षकांच्या विचाराचं,कल्पनांचं,उपक्रमांचं आदानप्रदान व्हाव.
एकमेकांना त्याचा उपयोग व्हावा.यासाठी Whatapp हे माध्यम मला उपयुक्त वाटलं.
आज खरचं Whatapp च्या माध्यमातुन लाखो शिक्षक जोडलेले आहेत.
गेल्या वर्षभरात 60 जण या ग्रुपशी जोडले गेले.हिरेमोती निवडावेत तशी ही माणसं मी निवडलेली आहेत.
प्रत्येकजण उपक्रमशील आहे.
खुप चांगले चांगले प्रयोग राबवतात.
काही मित्र तंत्रस्नेही पण आहेत.त्यांचे
स्व:ताचे ब्लाॅग व वेब आहेत.
प्रयोगशील अधिकारीही या ग्रुपमध्ये आहेत.
वर्षभर आपण या ग्रुपचे सहप्रवासी झालात.त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.

Tuesday 26 May 2015

झिरो बजेट गणित

झिरो बजेट गणित

कोल्हापुरच्या उपक्रमशील शिक्षिका शशीकला पाटील यांनी झिरो बजेट गणित हा उपक्रम छान राबविला आहे.
    सहज उपलब्ध होणा-या टाकाऊ वस्तुपासून गणित विषयाची अनेक शैक्षणिक साधने त्यांनी बनवलेली आहेत.
ज्ञानरचनावादी पद्धतीनं  मुलं  या साहीत्याच्या आधारे गणितातील संकल्पना समजून घेतात.
काडीपेटी,स्ट्राॅ,कोलड्रीक्सच्या बाटलीची झाकणं, छोटे छोटे पुठ्ठयाचे तुकडे,बिया,मणी  अशा कितीतरी वस्तुपासून त्यांनी साधनं बनवली आहेत.
हे परवा मला ATF च्या संमेलनात मला पाहायला मिळालं.अशी साधन मी नक्की बनवणार आहे माझ्या शाळेतील मुलांसाठी

Monday 25 May 2015

मुलांना समजून घेताना

ही आजची वैशाली गेडाम यांची Whatapp वरची पोस्ट.....चिंतनीय....

वैशाली गेडाम:-

माझ्या पहिल्या वर्गातील मुले देखील स्वतःची हजेरी स्वतः लावण्यास उत्सुक असायचे. त्यांच्यासाठी ती आनंदाची गोष्ट असायची . हजेरी लावणे हे आव्हान समोर असल्यामुळे मुले आपलं नाव लवकर लिहिण्या वाचण्यास शिकतात. मग त्यांना आपल्या मित्र मैत्रिणीचृ पण नाव हजेरीत बघण्याची इच्छा होते. या इच्छापूर्तीच्या गरजेतून मुले एकमेकांची नावे वाचण्यास शिकतात. अक्षरांशी ओळख होते. एवढेच नाही मुले आपले नाव कितव्या नंबरवर आहे, मित्राचे , मैत्रिणीच नाव किती नंबरवर आहे हे पण बघण्यस उत्सुक असतात. त्यामुळे संख्यावाचन ही गरज निर्माण होते व मुले संख्यावाचनाकडे वळतात. शिकतांना गरज भासायला हवी, समोर आव्हान हवे, उद्देश हवा म्हणजे मुले लवकर लवकर शिकतात. असे शिकणे आनंददायी कायमस्वरुपी असते. म्हणजे विसरणे ही समस्या निर्माण होत नाही. अर्थात हे एक उदाहरण आहे. अशा अनेक गरजा, आव्हाने, उद्देश निर्माण करुन शिकणे आनंददायी व सहज सोपे करता येते. अशा पद्धतीने शिकतांना शिक्षकांना काहीच सायास पडत नाहीत. केवळ कल्पक नियोजने करावी लागतात .......आणि मुलांवर प्रेम तर असतेच.                                                  
-वैशाली गेडाम

...........................................................

हजेरी हा दस्तावेज मुलांचा आहे. त्यामुळे हा दस्तावेज हाताळण्याची संधी त्यांना मिळायलाच हवी. तिसऱ्या वर्गातील मुले हजेरी बुकातील सर्व रकान्यांमधील माहिती स्वतः लिहू शकतात. किंबहुना ते त्यांनीच लिहायला हवं. तिसरीपासून पुढे मुलांनीच हे रजिस्टर भरायला हवं. मुलं, दैनंदिन उपस्थिती , मुलांची संख्या , मुलींची संख्या , एकूण उपस्थिती वगैरे लिहितात. हे सर्व करतांना मुलांची अक्षरे चांगली होतात कारण हजेरी बुक चांगलं दिसलं पाहिजे हा उद्देश असतो. गणितही पक्क होतं. पहिल्या दुसऱ्या वर्गाची हजेरी लिहिण्याची जबाबदारी पण वरच्या वर्गातील मुलांकडे द्यावी. ते ती आनंदाने पार पाडतात. सहावी सातवीच्या मुलांना दैनंदिन उपस्थितीचे शेकडा प्रमाण काढण्याची जबाबदारी द्यावी. सर्व शिक्षण कामांमध्ये दडलंय. कोरडे विषय शिकविण्यात काही अर्थ नाही. कामातून शिकण्यास पर्याय नाही. काम म्हणजे मूर्त ज्ञान.                                          - वैशाली

.........................................................

वैशालीताई माझ्या मते आपण  मुलांना खरंखुरं समजून घेत आहात.त्यासाठी कल्पकता तर हवीच पण मुलांच्या भावविश्वात जाऊन त्यांच जग समजून घ्यायला हवं.
अगदी मनमोकळेपणानं मुलांशी संवाद साधायला हवा.
तुला काय कळत यातलं?
हा शहाणपणा दूर ठेवायला हवा.स्वत:ची हजेरी स्व:त भरणं तसं साधी गोष्ट वाटली तरी खुप महत्त्वाची वाटते.

खरचं छान समजून घेतायत वैशालीताई आपण मुलांना.....

Thursday 21 May 2015

★ ATF शिक्षण संमेलन 2015★

★ ATF  शिक्षण संमेलन 2015★
अॅक्टीव टिचर फोरम चे शिक्षण संमेलन बायफ पुणे येथे 18 व 19 मे रोजी संपन्न झाले.सकारात्मक उर्जा घेऊन काम करणारे प्रयोगशील शिक्षक,शिक्षणतज्ञ, प्रयोगशील अधिकारी संमेलनासाठी आले होते. ATF चे संयोजक भाऊसाहेब चासकर यांनी छान प्रास्ताविक केले.
शिक्षणतज्ञ के.के.कृष्णकुमार यांनी "गुणवत्तापुर्ण शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणात शिक्षकाची भूमीका" या विषयावर विचार मांडले.सर्वानी त्यांच्यासोबत मनमोकळेपणानं चर्चा केली.भारतातील विविध शैक्षणिक प्रवाहाबद्दल सखोल विवेचन केलं.नंतर दृष्टीकोनात बदल हा परिसंवाद रंगला.
         प्रतिभा भराडे,मंजिरी निंबकर,मोहन भोईर,प्रल्हाद काठोले,नामदेव माळी,मोहन देस यांनी परिसंवादात भाग घेतला.नामदेव माळी सरांनी विनोदी शैलीनं व्यवस्थेतील उणीवा सांगीतल्या. व्यवस्थेतील सर्वानीच मुलांशी संवाद साधायला हवा.पदाचा हँगओव्हर होऊ नये. जी तारे,बेटं काम करतात त्यांना व्यवस्थेतेन बळ द्याव.
         प्रयोगशील शिक्षकांनी लावलेल्या पोस्टरचं वेगळच आकर्षण होतं. शाळेत राबवलेले प्रयोग,उपक्रम यावर पाहायला मिळत होते.राम,सोमनाथ,गुणेश,अनिल,फारूख,अगस्ती हे सर्वजण हाॅलमधील व्यवस्थेची काळजी घेत होते.
इंग्रजी व सेमी इंग्रजी यावर परिसंवाद झाला.वर्षा सहस्त्रबुद्धे,श्रीधर लोणी,जे.के.पाटील,फारूख काझी,कृतीका बुरघाटे, के.के.कृष्णकुमार यांनी सविस्तर चर्चा केली.मुलांचं शिक्षण प्राथमिक भाषेतुन व्हावं हाच मुख्य चर्चेचा सुर होता.शुभदा चौकर यांनी संचलन केले.
अशातच  प्रधान सचिव शालेय शिक्षण विभाग आदरणीय नंदकुमार साहेब आले.वातावरण प्रफुल्लीत झालं.साहेबांनी सर्वांसोबत छान चर्चा केली.
अचानक मस्तानी आल्याचा आनंद सर्वाना झाला.मस्तानीचा आस्वाद घेतल्यानंतर साहेबांनी पुन्हा सर्वाशी चर्चा केली.
शेवटी गाणी गप्पांचा छान कार्यक्रम रंगला......

संमेलनाच्या दुस-या दिवशी तंत्रज्ञानाचा शिक्षणात वापर यावर परसंवाद रंगला.विवेक सांवत,अनिल सोनुने,नीलेश निमकर,राम सालगुडे यांनी यात सहभाग घेतला.सांवत सरांनी खुप छान मार्गदर्शन केले.सर्वानी खुप छान चर्चा केली.सोमनाथ सरांनी संचलन केले.
यानंतर बालकांचे आणि व्यवस्थेचे मूल्यमापन या परिसंवादात वैशाली गेडाम,विवेक माॅटेरो यांनी सहभाग घेतला.वैशाली गेडाम यांनी त्या करत असलेल्या प्रयोगाविषयी सांगीतले.राहुल गवारे यांनी यांच संचलन केलं.
     संमेलनातला हा परिसंवाद खुपच झकास रंगला.शिक्षक म्हणून आपल्या समृद्धीसाठी या विषयावरप्रमोद धायगुडे,गुणेश डोईफोडे,सुरेश सुतार,कल्पना बनसोड,शशीकला पाटील,मोहन भोईर,सुवर्णा देशपांडे,योगेश थोरात या शिक्षकांनी विचार मांडले. प्रमोद धायगुडे,कल्पना बनसोड यांनी तर संपूर्ण सभागृहाला जिंकल.खुपच छान समृद्धीचा प्रवास कथन केला.प्रकाश आरोटे यांनी संचलन केले.
गीता महाशब्दे यांनी पुढील गुणवत्ता कार्यक्रमाबद्दल  माहीती दिली.त्यावर चर्चा झाली.
नंतर भाऊ,समिक्षा,हिरालाल सर यांनी ठराव मांडले.सर्व ठराव संमत झाले.
नामदेव माळी यांनी
धीरे धीरे यहाँ का मौसम बदलने लगा है........
हे गीत सर्वांसोबत गाऊन संमेलनाची
सांगता झाली.

माझं हे पहिलच संमेलन...मला खुप काही शिकायला मिळाल.संवाद साधता आला.या चळवळीतला कार्यकर्ता असल्याचा आनंद मनोमन होत होता.
भाऊचं व त्यांच्या सहका-याच्या कष्टातून उत्कृष्ट नियोजन झाल होत.

Wednesday 20 May 2015

भूकेसाठी भिक नको

आज माझ्या आर्यनला आइस्क्रीमचा कोन खाण्याची इच्छा झाली. आम्ही दोघही आइस्क्रीम आणण्यासाठी गाडीवर निघालो.बालहट्टापुढं पर्याय नव्हता.
बाहेर
ऊन मी म्हणत होत.
40 अंशाच्या पुढ पारा असावा.
गाडीवर जाताना एक दृश्य दिसल.
एक मुलगी या रणरणत्या ऊन्हात गाण्याच्या तालावर कसरती करत होती.एक तिची छोटी बहीण परातीवर छडीनं मारून वाजवत होती.एकजण आॅरगण वाजवत होता तर दुसरा चित्रपटातील गीत गात होता. अशा रणरणत्या ऊन्हात पोटाची खळगी भरण्यसाठी चाललेली ही धडपड पाहून थोडी तिथं गाडी थांबवली....थांबलीच. ही दोन तीन मुलं शाळाबाह्य असावीत. पण जगण्यासाठी ही जीवघेणी कसरत बघताना हे बघणा-याला काय आनंद देत असेल?
माझ्या लेकराला ऊन लागू नये म्हणून डोक्याला मी रूमाल बांधला होता.
पण ती
लेकरं
तर भर ऊन्हात जगण्यासाठीचा संघर्ष करत होती.माझ्या मनाला खुप वेदना झाल्या.
पण पाहण्याशिवाय काय करू शकत होतो. या वंचीताना
माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाही काय?
त्यांची भूक शमवण्यासाठी आपण
फक्त
भिक देणार आहोत काय?
मग अशा वंचितासाठी समाजाची संवेदनशीलता
नक्कीच जागायला हवी.
त्यासाठी समजून घ्यावी लागेल त्यांची सहवेदना..........

Saturday 16 May 2015

भाषा शिक्षणातील प्रयोग

बहिरवाडी शाळेतल्या मुलांना भाषा शिकवताना केलेले प्रयत्न...

      अकोले (जि. अहमदनगर) तालुक्यातील बहिरवाडी या आदिवासीबहुल खेड्यातल्या प्राथमिक शाळेत मी शिकवितो. आदिवासी ठाकर, वडारी आणि ग्रामीण मराठी बोलणारे असे तीन निरनिराळ्या भाषिक समुहातली मुले शाळेत येतात. आम्हा शिक्षकांची, पाठ्यपुस्तकांची भाषा आणि मुलांची भाषा यात मोठे अंतर पडायचे. वडारी आणि ठाकरी दोन्ही भाषा मराठीपेक्षा बऱ्याच वेगळ्या आहेत. त्यात आदिवासी मुलांच्या भाषिक विकासावर आधीच अनेक गोष्टी परिणाम करत असतात. मुळातच आदिवासी मुलं लाजरीबुजरी. अडचणी लवकर सांगत नाहीत. ‘मन की बात’ बोलून दाखवत नाहीत. त्यात त्यांची चूक नाही. त्यांचे आई-वडील त्यांच्या जीवन संघर्षात अडकलेले.

डोंगरकाठी वस्ती. त्यांच्या जगण्याचे प्राधान्यक्रमच निराळे. रोज मजुरीने नाही गेले तर खायचीप्यायची भ्रांत. हे भूमिहीन शेतमजूर रोज उठून कुठेना कुठे कामाला निघून जाणार. मुले शाळेत गेली काय आणि नाही काय... दिवसदिवस मुलांशी बोलायला घरी-दारी, वस्तीत मोठे माणूस शोधून सापडणार नाही! वस्ती दिवसा ओस पडलेली. एखाद्या ओसरीवर अस्थिपंजर म्हातारी व्यक्ती तीही अंथरुणाला खीळलेली... जवळजवळ मुक्या मुक्या मुलं एकमेकांशी खेळत राहतात. ऐकायला नाही मिळाले तर बोलणार काय. दमूनभागून सायंकाळी मोठे लोकं घरी आले की लवकरच झोपी जाणार. सकाळी उठून पुन्हा दुष्टचक्र सूरु होते... मुलांशी बोलणे, हवे नको हे विचारणे असे नसतेच तिकडे. अशा अभावग्रस्त वातावरणात मुलांची भाषिक जडणघडण कशी होणार?

मग वाड्या-पाड्यातील मुलं केवळ नावाला शाळेत यायची. शाळेत ती रमायची नाहीत. नीट लिहू, वाचू शकायची नाहीत. आम्ही शिक्षकांनी मुलांच्या भाषा काही प्रमाणात का होईना शिकून घेतल्या. शाळेत आल्यानंतर मुलांशी त्यांच्या भाषेत बोलू लागलो. एक दिवस गैरहजर असलेल्या मुलाला

उदा. काल कोठे गेला होतास? असा प्रश्न न विचारता. त्याच्या भाषेत- सांग कुख गेला था नावं? असे विचारु लागलो. तसेच वडारी भाषेचे- 'जेवण केले का?' ऐवजी 'रोटी टींट्यांव?',  'इकडे ये' ऐवजी 'एक्कडदा' असे करत गेलो.

पाखरं, झाड-वेली, गाईगुरं अशा त्यांच्या भावविश्वातल्या गोष्टींविषयी मुलांना त्यांच्या भाषेत ‘बोलते’ करू लागलो. मस्त गप्पा मारू लागलो. विश्वास संपादन करत गेलो. चित्र हळूहळू बदलू लागले. मुलं मोकळी झाली. शांत, उदास, खिन्न, शून्यमनस्क अवस्थेत वर्गात येवून बसणारी मुलं जरा बदलू लागली. काही मुलं नाही बोलली तरी त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची हसरी लहर सहज दिसून यायची. या गप्पांमुळे मुलांच्या मनातील शिक्षकांविषयीची, शाळेविषयीची, तिथल्या विशिष्ट वातावरणाविषयी वाटणारी भीती, दहशत, दडपण काही प्रमाणात कमी झाल्याचे आमच्या लक्षात आले.

मुलांची भाषा ‘स्वीकारणे’, ही वरकरणी खूप साधी वाटणारी गोष्ट. पण यातून मोठा परिणाम दिसून आला. मुलांच्या भाषेला आम्ही स्वीकारले आणि मुलांनी आम्हाला आणि शाळेला स्वीकारले! वर्गात या मुलांशी आम्ही त्यांच्या भाषेत बोलू लागलो. तेव्हा प्रमाण भाषेजवळ जाणारे मराठी बोलता येणारी काही मुलं हसायची. पण नंतर न सांगता ते  आपोआप बंद झाले.

आदिवासी मुलांच्या भावविश्वात निसर्गाला विशेष स्थान असते.  त्यातील झाडे, वेली, फुले, पक्षी याबाबत मुलांचे सूक्ष्म निरीक्षण असते. आमच्या शाळेच्या परिसरात बहारदार निसर्ग आहे. आम्ही परिसर भेटीची संख्या मुद्दाम वाढवली. वरचेवर मुलांना घेऊन जंगलात जाऊ लागलो. आधी स्थानिक माहितगार माणसांच्या मदतीने मुलांना जंगलाची माहिती देत असू. आता आदिवासी समाजातील मुलंच स्वतःहून बोलू लागली. अलिबाबाच्या गुहेचा दरवाजा उघडल्यासारखं झालं. वाघ कुठे राहतो. त्याचा आवाज, पायाचे ठसे,( ठाकरी भाषेत ‘माग’ म्हणतात.) इतर जंगली प्राण्यांच्या सवयी, पक्षी, विषारी-बिनविषारी साप, पाखरं, मधमाशा, मुंग्या, औषधी वनस्पती, कंदमुळे-फळे कित्ती गोष्टी या मुलांना माहिती होत्या! ज्या आम्हा शिक्षकांच्या गावी नव्हत्या.

आता लाजरेपणा, बुजरेपणा सोडून स्वत:च्या भाषेत माहिती सांगायला पुढे येऊ लागली. भले ते वाचन, लेखन, पाठांतर किंवा वर्गातल्या इतर गोष्टींत मागे होती. परंतु या परिसर भेटीदरम्यान ते इतर मुलांना माहिती सांगत पक्ष्यांचे आवाज काढून दाखवत. डोहात उडी मारून पोहत, डोंगरांची नावे घेताना वाऱ्याच्या वेगाने धावत, माकडासारखे झाडावर चढून फळं काढताना,  कंदमुळं खोदून काढताना शाळेतील पहिल्या बेंचवर बसणारी, संगणक हाताळणारी, आपल्या ‘हुश्शारी’चा तोरा मिरवणारी मुलं आदिवासी मुलांमागे कधी फिरू लागली, हे त्यांना सोडा आम्हालाही कळले नाही! त्यातून आदिवासी मुलांना भारी आत्मविश्वास मिळत गेला.

आपल्याकडे असलेल्या माहितीला आणि भाषेलाही काहीतरी प्रतिष्ठा आहे, आपले जगणे जसेच्या तसे स्वीकारले जातेय, हे मुलांना सुखावणारे होते. त्यामुळे त्यांना शाळेची गोडी वाढली. शिक्षणात रस वाटू लागला. वरचेवर शाळेला बुट्टी मारणारी मुलं उत्साहाने शाळेत येऊ लागली. आता शाळा आणि घर यांना जोडणारा बोली ते प्रमाणभाषा असा पक्का भाषिक पूल बांधला होता. शाळेतल्या चार भिंतीआड असताना त्यांच्या मनातले फुलपाखरू रानावनात उडत-बागडत असे. आता आठवड्यातून एकदा शाळाच जंगलात भरायला लागली!

आदिवासी मुलांशी त्यांच्या अनुभाविश्वातल्या विषयांवर आधी आम्ही खूप बोलायचो. भरपूर गप्पा मारायचो. काही शब्द, वाक्ये लिहायला सांगायचो. प्रमाणभाषेची लिपी आणि मुलांची भाषेतली लिपी यात बरीच तफावत असायची. उदाहरणार्थ, दुस-या वर्गात ‘सामर्थ्य’ या शब्दाऐवजी ‘सामरथ्य’ किंवा ‘प्रसंग’ ऐवजी ‘परसंग,’ आशीरवाद, असे शब्द मुले लिहीत असत. सुरुवातीला ते स्वीकारून पुढे त्यांना हेच शब्द प्रमाणभाषेत कसे लिहायचे, हे सांगितले. (तुम्ही लिहिलेले पण बरोबर आहे, हे आवर्जून सांगायचो!) मुलांसमोर त्यांनी लिहिलेल्या मजकुरावर लाल पेनाने चुकीची फुली मारून कधी मुलांना नाउमेद केले नाही. दिलेल्या प्रश्नाचे उत्तर लिहितानाही मुलांनी लिहिलेलं उत्तर व्याकरणाचा काटेकोरपणा बाजूला ठेवून उत्तरं स्वीकारले. हळूहळू मुले लिहिती झाली. रानात हिंडायला गेल्यावर फळे-कंदमुळे खायला देणाऱ्या मुलांशी आता दोस्ती झालेली मुले त्यांना मदत करायला लागली होती. लेखन कौशल्य विकसित करताना त्यांची खूप मदत झाली. मुलांनी मुलांना शिकवण्याइतकी प्रभावी गोष्ट नाही, असे मला सतत वाटत आलेय.

‘तुमच्या भाषेत, शब्दांत व्यक्त व्हा’ असे आवाहन मुलांना केले. त्यांच्या भाषेत मुक्तपणे व्यक्त व्हायला भरपूर वाव, चुका करायला मुभा दिल्याने मुलं हळूहळू व्यक्त होऊ शकली. शब्द-वाक्य-वाक्ये-परिच्छेद हा प्रवास आमचा उत्साह वाढवणारा होता. आदिवासी समाजातील मुले ठाकरी भाषेत, भटक्या विमुक्त जमातीतील मुले तेलगुमिश्रित वडारी भाषेत, मराठा मुले त्यांच्या ग्रामीण ढंगातल्या भाषेत लिहिती झालीयेत. एरवी सातव्या वर्गांपर्यंत शिकल्यावरही प्रमाणभाषेत निबंधलेखन ५-१० ओळींत संपविणारी ही मुलं. आता त्यांच्या भाषेत व्यक्त होताना पान-दीड पानभर मजकूर लिहिताहेत. पाच-दहा वाक्यांत त्यांचे ‘भांडवल’ आता संपत नाही. आवडीच्या विषयावर लिहायला सांगितल्यावर मुलांनी भरभरून लिहिलेय. ‘आमची बाराखडी’ हस्तलिखित म्हणजे मुलांना भाषेच्या अंगणात मूक्तपणे व्यक्त व्हायची भरपूर संधी देणारी त्यांची हक्कशीर जागा. मुलांनी लिहिलेले निबंध आम्ही पाठ्यपुस्तकातल्या पाठाला पर्यायी पाठ म्हणून शिकवले. मुलांना कोण आनंद व्हायचा. लेखक म्हणून त्या मुलाचे किंवा मुलीचे नाव घ्यायचो. त्या मुलांचा आत्मविश्वास दुणावत असे. काही मुलांचे ललित निबंध नियतकालिकांत छापून आले. आपण लिहिलेला मजकूर छापून आलेला पाहून मुले मनोमन सुखावली. लेखक म्हणून मानधनाचे चेक मुलांच्या नावावर घरी आले! मुले आणि घरवाले किती आनंदून गेले असतील. नवे काही शिकायचा आनंद यापेक्षा वेगळा काय असतो?

‘माझे शिवार’ या विषयावरील हस्तलिखिताच्या अंकात मुलांनी शिवाराशी असलेले भावनिक नाते छानपैकी शब्दबद्ध केलेय. प्रत्येक मुलाच्या भावविश्वात शिवाराला विशेष स्थान असले तरी लेखनाचा विषय म्हणून मुलांनी शिवाराकडे कधीच पाहिले नव्हते. शिवार हा विषय मुलांनीच चर्चेतून निवडला. शिवारावर लिहायचे म्हटल्यावर विद्यार्थ्यांनी नेहमीच्या परिचयाच्या गोष्टींकडे निराळ्या नजरेने पाहायला सुरुवात केली. गाव-शिवाराबद्दल त्यांचं कुतूहल जागं झालं. शिक्षकांनी मुलांसमवेत शिवारफेरी मारली. त्यानंतर कोणी शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या मुलाखती घेतल्या. कोणी कृषिसेवा केंद्र्चालकांशी संवाद साधला. कोणी तलाठ्याच्या दप्तरातून नोंदींची जंत्री जमवली. कोणी आपल्या शेतकरी बापाविषयीच्या भावनांना शब्दरूप दिलं. त्याला भेडसावणाऱ्या समस्यांना हात घालण्याचा प्रयत्नही केला. शेती, माती, नाती, पिके-पाणी, रान, गाईगुरं अशा ‘परिचया’च्या शिवाराकडे पाहण्याचा नाव दृष्टीकोन मुलांना लिहिण्यातून मिळाला.

‘सांग मा पाखरां मारीत न्हाई,  झाडा तोडीत न्हाई’  असे आपल्या निबंधात लिहिणाऱ्या सागर खडके या आदिवासी मुलातील बदल त्याला पर्यावरणाबाबत आलेले भान सांगून गेला. मुलांनी गाव परिसरात बोलले जाणारे शेकडो शब्द जमवले आहेत. त्यांना प्रमाणभाषेतले शब्द लिहून लहानसा शब्द कोश तयार झाला आहे. ग्रामीण ,आदिवासी भागात उत्सव, सण, समारंभात म्हटल्या जाणाऱ्या लोकगीतांचे संकलन मुलांनी केलेय. भरपूर वाक्प्रचार, शब्दप्रयोग, शिव्या असे साहित्य  लिहून ठेवलेय. यातले काही शब्द काही लोकगीते तर त्या त्या वयोवृद्ध व्यक्तींबरोबर मरणपंथाला लागलेले आहेत. त्याचे जतन संवर्धन यानिमित्ताने होतेय. कृषी संस्कृतीशी संबंधित अनेक शब्द आज मराठी शब्दकोशात नाहीत. आम्ही मुलांच्या मदतीने परिसरातील कृषी पारिभाषिक शब्दांचा शब्दकोश तयार करायच्या प्रयत्नात आहोत. या सगळ्यातून मुले केवळ धडे कविता शिकून त्याखाली दिलेले प्रश्नोत्तरे न लिहिता मुळातून भाषा काय आहे? तिचा लहेजा आणि तिचे सौंदर्य जाणून घेत आहेत. मज्जा येतेय.

~~~भाऊसाहेब चासकर,
बहिरवाडी, अकोले, जि.नगर.
bhauchaskar@gmail.com